शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव जाहीर करा – युवा नेते बालाजी भैय्या मेटे
केज/प्रतिनिधी
शेतकरी कर्जमाफी करिता श्री. बच्चू कडू यांनी आंदोलनास सुरुवात केलेली आहे. या मागणीचा शासन गांभीर्याने आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निश्चितच विचार करेल असा आशावाद आहे. परंतु शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफी मागण्याची वेळ येऊ नये याकरिता ठोस उपाय योजना करणे देखील गरजेचे आहे.शेतकऱ्यांना वेळेवर आणि मुबलक तसेच किफायतशीर दरामध्ये व दर्जेदार खते बी बियाणे पुरवठा होणे गरजेचे आहे .लागवड पूर्व, लागवड पश्चात आणि कापणी पश्चात अशा तीनही टप्प्यांकरिता सर्वंकष एकात्मिक धोरण आखण्यात यावे उत्पादन ते विपणन ही साखळी प्रभावी करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभावाची शासनाने तरतूद करणे अतिशय गरजेचे आहे.शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणाऱ्या गाव पातळीवरील विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे प्रभावी व्यवस्थापन आणि गाव तिथे विविध कार्यकारी सहकारी संस्था नोंदवून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण केल्यास शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफीची आवश्यकता पडणार नाही याची देखील शासनाने दखल घेऊन. यथोचित कार्यवाही करावी.





















