हक्काचा माणूस विकास कामातही ठरला सरस; नेकनूर सर्कलमध्ये पुन्हा भारत काळेच!
बीड/प्रतिनिधी
नेकनूर सर्कलमध्ये विकासाची नवी दिशा दाखवणारे माजी जिल्हा परिषद सदस्य भारत बप्पा काळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांमुळे हक्काचा माणूस अशी ओळख निर्माण झालेल्या काळे यांच्याकडून मतदारांना यावेळीही मोठ्या अपेक्षा आहेत.गेल्या कार्यकाळात कोट्यवधींची कामे मार्गी लावत, रस्ते, पिण्याचे पाणी, स्मशानभूमी विकास, शाळा दुरुस्ती आणि सार्वजनिक सुविधांची उभारणी करून त्यांनी आपल्या गटाला नवा चेहरा दिला. आता उर्वरित विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ते पुन्हा जनता दरबारात जाणार असून, मायबाप जनतेच्या आशीर्वादाने सुरू केलेला विकासाचा यज्ञ पूर्ण करणार, असा त्यांचा निर्धार आहे. नेकनूरचे भूमिपुत्र असलेले भारत काळे हे याआधीही जिल्हा परिषद सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगिरी करून गेले आहेत. श्री गुरु बंकट स्वामींच्या पावनभूमीत राहिलेल्या विकासाच्या उणिवा भरून काढण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्यांना नेहमीच माजी खासदार प्रीतमताई मुंडे, मार्गदर्शन लाभले आहे. या नेतृत्वाच्या पाठबळावर नेकनूर जिल्हा परिषद गटात विकासाची गंगा आणण्यात काळे यशस्वी झाले आहेत. गावातील प्रत्येक कुटुंबाचा विकास हा माझा हेतू आहे. आजवर जनतेने दिलेला आशीर्वादच माझी खरी ताकद आहे. आता मतदानरूपी आशीर्वाद देऊन पुन्हा काम करण्याची संधी द्यावी, असा विश्वास भारत काळे यांनी व्यक्त केला.नेकनूर व परिसरातील मतदारांमध्ये त्यांच्याबद्दलचा उत्साह पुन्हा जागा झाला आहे. चहापान बैठकांपासून ते कार्यकर्त्यांच्या चर्चापर्यंत, यंदा पुन्हा भारत काळेच! अशी घोषवाक्ये ऐकू येत आहेत. स्थानिक पातळीवर जनतेत मिसळून काम करणारे, समस्या समजून घेणारे, आणि प्रत्यक्ष कृती करणारे नेते म्हणून काळे यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. विकासाचा प्रवास पुन्हा सुरू करण्याची तयारी नेकनूर सर्कलमध्ये रंगात आली असून, जनतेच्या आशीर्वादावर उभा राहिलेला हा नेता पुन्हा जनतेसाठी लढतोय, असा जनतेचा ठाम विश्वास दिसून येतो.





















