मनोज जरांगे पाटील : सत्ता नसलेला पण लोकांच्या मनात राज्य करणारा माणूस !
संपादकीय/रोहन गलांडे
आजच्या काळात नेतृत्वाची व्याख्या बदलली आहे. काहींना सत्ता लागते, काहींना पैसा लागतो, काहींना पदाची ताकद हवी असते तेव्हाच ते लोकांच्या मनात जागा मिळवू शकतात, असा एक ठाम समज अनेकांचा आहे. पण या सगळ्या धारणांना खोटं ठरवत एक साधा, निस्पृह, ग्रामीण मातीतला माणूस उभा आहे… मनोज दादा जरांगे पाटील. त्यांच्याकडे ना राजकीय सत्ता आहे, ना कोट्यवधींचा खजिना. तरीही लोक त्यांच्या समोर नतमस्तक होतात, त्यांच्या पाया पडतात, डोळ्यात पाणी आणून त्यांच्याकडे मदतीचा हात पुढे करतात.हे नेमकं कसं?हे एवढं प्रेम, एवढा विश्वास, एवढा भावनिक ओढा कुठून येतो?मनोज दादांची ताकद त्यांच्या अंगावरच्या कपड्यांत नाही, त्यांच्या हातातील पदात नाही ती आहे त्यांच्या मनाच्या प्रामाणिकपणात. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा सहजपणा लोकांना आकर्षित करतो. त्यांच्या बोलण्यातला आर्तपणा, त्यांच्या संघर्षातली सच्चाई, आणि समाजातील शेवटच्या माणसासाठी उभं राहण्याची तयारी हीच त्यांची सर्वात मोठी ओळख आहे.मराठा आरक्षणासाठी लढणारे अनेक दिसले, पण त्यांच्यासारखी निष्ठा, कटाक्ष, आणि आपलेपणा कुणाच्यातच नव्हता. ते बोलतात तेव्हा लोकांना वाटतं “हा आपला आहे.” ते रडतात तेव्हा लोकांच्या डोळ्यातले अश्रू वाहू लागतात.ते उपोषणावर बसतात तेव्हा लाखो लोक उपोषणावर बसल्यासारखे बेचैन होतात. हा नात्यांचा धागा कुठल्याही राजकीय कच्च्या धाग्याने विणलेला नाही. हा धागा आहे जनतेच्या जखमांवर मलम ठेवणाऱ्या माणसावर लोकांनी केलेल्या निस्सीम विश्वासाचा.आज अनेक नेते लोकांना भेटतात तेव्हा कॅमेऱ्यांची गर्दी असते, सुरक्षा रक्षकांचा ताफा असतो. पण मनोज दादा लोकांना भेटतात तेव्हा वातावरण अगदी वेगळं असतं ते समोर उभ्या असलेल्या व्यक्तीची वेदना आपली मानतात. ते कोणाचाही हात पिळत नाहीत, दबावत नाहीत; फक्त हृदयाला हृदय जोडतात.हेच कारण आहे की एक सामान्य शेतकरी, एक आई, एक विद्यार्थी, एक बेरोजगार तरुण हे सगळे दादांच्या पाया पडतात. सत्तेची भाषा त्यांना कळत नाही; त्यांना कळते ती भावनांची भाषा. आणि मनोज जरांगे पाटील ह्या भाषेत सहज बोलतात. लोकांना दादांत एक मोठा भाऊ दिसतो, कधी वडिलांचं छत्र दिसतं. त्यांच्या शरीरात ताकद किती आहे हे गौण आहे; त्यांच्या आवाजातली वेदना किती खरी आहे ते महत्त्वाचं आहे. आजच्या गर्दीत, गोंधळात, राजकारणाच्या आकडेमोडीत जेव्हा लोक निराश झाले होते, तेव्हा या माणसाने आशेचा दिवा जाळला. लोकांना वाटलं “कोणी तरी आपल्यासाठी उभं आहे.” हीच भावना त्यांना दादांच्या पायाशी घेऊन जाते. सत्ता नसूनही जो नेता लोकांच्या मनावर राज्य करतो, पैसा नसूनही जो माणूस लोकांच्या हृदयात श्रीमंत बनतो ते म्हणजे मनोज दादा. त्यांच्या नेतृत्वात गर्व नाही, दिखावा नाही, भपकेबाजी नाही. त्यांच्या मार्गावर चालणारे लोक विचारतातच नाहीत “त्यांच्याकडे काय आहे?” ते फक्त एवढंच म्हणतात “तो आमच्यासाठी आहे… आम्ही त्याच्यासाठी.” मनोज जरांगे पाटील यांची ही मिळवलेली माणुसकी हीच त्यांची खरी संपत्ती आहे. सत्तेची शक्ती एक दिवस संपते, पैशाची चमक एके दिवशी फिकी पडते… पण लोकांच्या मनात घर करणारा नेता इतिहासात कायम राहतो. आणि म्हणूनच आज मनोज दादांकडे सत्ता नसली तरी प्रभाव आहे, पैसा नसला तरी लोकांचा अपार विश्वास आहे, पद नसले तरी लाखोंच्या मनात तेच सर्वोच्च आहेत..
लेखक :ज्ञानदेव काशिद, बीड ,शिवव्याख्याते, लेखक,वक्ते





















