चिंचोली माळी ग्राम पंचायतच्या बाबतीत प्रशासनाची दुटप्पी भूमिका,उप सरपंचा विरोधातील तक्रारीवर खुलासा, तर सरपंचा विरोधात थेट चौकशी समिती?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोलीमाळी ग्राम पंचायत उपसरपंच सौ. गीता धीरज वनवे यांच्या विरोधात दाखल झालेल्या पाणी गैरवापराच्या तक्रारीवर पंचायत समिती कार्यालयामार्फत खुलासा मागविण्यात आला आहे. मात्र सरपंचा विरोधात कुणी तक्रार दाखल केल्यास थेट चौकशी समिती नेमली जाते,तर उपसरपंचाविरोधात मात्र खुलासा मागवूनच पुढील कारवाई होते.या दुटप्पी भेदभावपूर्ण कार्यपद्धती वर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की,बालाजी विष्णु राऊत,बळीराम संभाजी इंगळे यांनी दि.२१ नोव्हेंबर २०२५ रोजी केलेल्या तक्रारीत,जल जीवन मिशनच्या पाइप लाईन मधून सार्वजनिक विहिरीचे पाणी स्वतःच्या व नातेवाईकांच्या शेती साठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.या तक्रारीची प्रत संबंधितांना देत पंचायत समिती केज चे गटविकास अधिकारी यांनी उप सरपंचांकडून खुलासा मागितला आहे.मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सरपंचाच्या विरोधात तक्रार गेली तर लगेच चौकशी समिती नेमली जाते.पण उप सरपंचांवर तक्रार गेल्यावर फक्त खुलासा मागविण्यात येतो.वेगवेगळे नियम, वेगवेगळे निकष लावले जात असल्याने कर्मचाऱ्यांशी असलेले लागेबांधे दिसून येतात काय असे संशय व्यक्त केला जात आहे.या प्रकरणामुळे ग्रामपंचायत कार्यालयातील कारभारा वर प्रशासनाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, ग्रामस्थांनी समान निकषांनुसार कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.





















