पाटोदा–जवळला फाटा(शंभरचिरा) रस्त्याचे काम बोगस/ ५ डिसेंबरला उपोषणाला बसणार- ॲड.नरसिंह जाधव
आष्टी/प्रतिनिधी
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना (MRL–01, NH-561 जवळाला फाटा ते पाटोदा) या ६.६१ कोटींच्या रस्त्यावरील कथित निष्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत केलेल्या तक्रारीवर आजवर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. नरसिंह लक्ष्मणराव जाधव आणि शेख मोबिन यांनी ५ डिसेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालय पाटोदा येथे एकदिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला . जाधव यांनी ०९ जुलै २०२५ आणि ०३ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीत रस्ता इस्टिमेटप्रमाणे न करता, सबलेट पद्धतीने उथळ, निकृष्टरीत्या व अंदाजपत्रकविरोधी केला असल्याचे पुराव्यासह नमूद केले होते. रस्ता केवळ एका महिन्यात उखडला असून, ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांनी मिळून सुमारे ६.५० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर आरोपही जाधव यांनी केला आहे . या तक्रारीनंतर कार्यकारी अभियंता, PMGSY बीड यांनी पावसाळा संपल्यानंतर चांगल्या दर्जाच्या ठेकेदाराकडून मानकाप्रमाणे नवे काम करून घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र, पावसाळा संपूनही अद्याप कोणतीही दुरुस्ती, पुनर्बांधणी किंवा कारवाई न केल्याचा आरोप जाधव यांनी केला असून जाधव यांनी दोषींवर प्रशासकीय व फौजदारी कारवाई, जनतेच्या पैशातून वाया गेलेली भरपाई वसूल करणे आणि रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे नव्याने करणे या मागण्या वारंवार केल्या. परंतु, वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ग्रामविकास मंत्रालयापर्यंत सर्व स्तरांवर निवेदने पाठवूनही कारवाई न झाल्याने आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला . सरकारी खात्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. जनतेचा सहा कोटींहून अधिक निधी वाया घालवणाऱ्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर कारवाई न झाल्यास हा लढा आणखी तीव्र करू, येत्या ५ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण दि. १६/११/२०२५ रोजी यांनी तहसीलदार व PMGSY चे संबंधित अधिकारी यांना निवेदन दिले . या निवेदनावर राष्ट्रवादी श.प. तालुकाध्यक्ष आनंद जाधव, उ भा.ठा तालुकाध्यक्ष मुकुंद शिंदे, काँग्रेस तालुकाध्यक्ष राहुल जाधव, भाई विष्णुपंत घोलप, मुखराम पठाण, रियाज सय्यद, महादेव जाधव, सय्यद आमेर, सय्यद यासीन, सय्यद अर्षद, राजेंद्र जाधव, अशा इतर २६ लोकांनी सह्या असून या उपोषणाने शासनाचे लक्ष वेधले जाईल असे ॲड. नरसिंह जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे .





















