खा.बजरंग सोनवणे पुरग्रस्तांच्या भेटीला; मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्दशेतकऱ्यांचे पुसले आश्रू, केज, अंबाजोगाई तालुक्यात दिल्या भेटी!
बीड/प्रतिनिधी
बीड: बीड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मंगळवारी पहाटे जिल्ह्यातील ५७ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून खा.बजरंग सोनवणे मागील आठ दिवसांपुर्वी झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करून दिल्लीला गेले होते. यानंतर मागे पुन्हा अतिवृष्टी झाल्याने ते तातडीने मंगळवारी सकाळी बीडला रवाना झाले. यानंतर दुपारी त्यांनी धानोरा, देवळा (ता.अंबाजोगाई) आणि इस्थळ (ता.केज) येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.बीड जिल्ह्यात दि.१४ सप्टेंबरपासून अतिवृष्टी होत आहे. पहिल्यांदा अतिवृष्टी झाली तेव्हा तातडीने खा.बजरंग सोनवणे यांनी बांधावर जावून पिकाची पाहणी केली होती. यानंतर काही दिवसाने पाऊस थांबला होता. दरम्यान, खा.बजरंग सोनवणे हे दिल्ली येथे जिल्ह्याच्या विकास कामाच्या निमीत्ताने गेले होते. यानंतर बीड जिल्ह्यात पावसाने सुरूवात केली. सलग तीन दिवसांपाूसन बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे. यामुळे नद्याना महापूर आलेला आहे. या पुरात शेती आणि पिकेही वाहून गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांचे पशुधनही वाहून गेले असून कोट्यावधी रूपयांचे नुकसान झालेले आहे. मागील काही दिवसांपासून शेतात पाणी असल्याने पिके पिवळी पडत आहेत. शिवाय पुरामुळे शेती खरडून गेली असून आता पुन्हा शेतकऱ्यांनी शेती करायची कशी असा प्रश्न आहे. मंगळवारी खा.बजरंग सोनवणे हे दिल्लीवरून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी परतले. यानंतर त्यांनी केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी, आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. कोणतीही अडचण वाटली तर संपर्क करा, तुम्हाला शासनस्तरावर मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, वेळप्रसंगी शासनाला भांडू परंतु मदत मिळवून देऊ, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
आज पाटोदा, शिरूर बीड दौरा:-
खा.बजरंग सोनवणे हे आज पाटोदा, शिरूर आणि बीड तालुक्यातून वाहणाऱ्या मोठ्या नद्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. पाटोदा, शिरूर शहरात पाणी शिरूर त्याठिकाणी व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले होते. त्याठिकाणी देखील ते भेटी देणार आहेत. तर बीड तालुक्यात सिंदफणामुळे जिथे नुकसान झाले आहेत, अशा ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.





















