जीआरला फेरफार केली तर आम्ही करोडच्या संख्येने मराठे रस्त्यावर दिसणार-मनोज जरांगे
संपादकीय/रोहन गलांडे
ऐन गणेशोत्सवाच्या काळात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईत दाखल झाला होता. यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. मात्र, राज्य सरकारने काढलेल्या जीआरवरून ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ओबीसी उपसमितीच्या बैठकीत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यापूर्वी दिलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. आता यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय.मनोज जरांगे पाटील म्हणाले की, त्या काय म्हटल्या हे मी ऐकले नाही. पंकजा मुंडे काय म्हटल्या काय नाही, हे मी ऐकलं नाही, मला नाही वाटत त्या अशा बोलल्या असतील आणि त्या बोलल्याच असतील तर मराठ्यांनी सावध होणे गरजेचे आहे. बघा मराठ्यांनो… ज्यांचं राजकीय करिअर मोठ होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात. तेच माणसं आपल्या लेकरा बाळांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले, त्या प्रमाणपत्रावर आणि त्याच मराठ्यांच्या लेकरांच्या मुळावर घाव घालण्याचे काम करत असतील तर मग अवघड आहे, असा हल्लाबोल त्यांनी के ला. मराठवाड्यातील मराठ्यांनी आणि बीड जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी विचार करणे गरजेचे आहे. तुमच्यासाठी जात महत्त्वाची आहे. जीआर टिकवणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.





















