कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना हमिभाव ठरवून उसाचा पहिला हप्ता तात्काळ देण्याची छावा संघटनेची मागणी !
कळंब /प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा पहिला हप्ता हमीभाव ठरवुन तात्काळ अदा करावा अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय छवा संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी मा. गणेश शिंदे यांना शिष्टमंडळाच्या वतीने दि.१० डिसेंबर २०२५ रोजी देण्यात आले. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे चालु वर्षातील खरीप हंगाम पुर्णतः उद्धस्त झाला असून शेतकऱ्याच्या हातात काहीच न पडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. परिसरातील ऊस कारखाने सुरु होवून महीना उलटुन गेला असून, अद्यापही उसाचा हमिभाव ठरवून पहिला हप्ता मिळालेला नाही. त्याच बरोबर कारखान्यांकडुन शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीने चर्चा किंवा बैठक घेऊन ऊसाचा दरही निश्चित झालेला नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडला आहे. तर वर्षभर कष्ट करुन मोठा खर्च करुन पिकवलेला ऊस शेतकऱ्यांकडुन कोणताही हमी भाव जाहीर न करता कारखान्यांनी ऊस घेणे सुरूच ठेवले आहे. तर हमीभाव न ठरवून त्यांची उसाची बिले प्रलंबीत ठेवणे ही गंभीर बाब असून तो शेतकऱ्यांवर होणाराअन्याय आहे. खरीप हंगाम गेला असून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. कारखान्यांना विविध सवलती व अनुदाने मिळतात, मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमालाला व घामाला किंमत दिली जात नाही. लवकरात लवकर ऊसाचा दर जाहीर करून पहिला हप्ता अदा करण्यात यावा. तसेच पहिला हप्ता अदा केला गेला नाही, तर प्रत्येक कारखान्यावर जावून छावा स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. दिलेल्या निवेदनावर छावा संघटनेच्या महिला आघाडी मराठवाडा अध्यक्ष राजकन्या जावळे, कळंब तालुका अध्यक्ष विठ्ठल यादव,शहराध्यक्ष अमर गायकवाड, राजकुमार सावंत,हनुमंत घाडगे,लाला कांबळे, अमोल कसबे,मकरंद पुरी, अजय देवकुळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





















