टोल वसुली नागरिकांचा जीव धोक्यात घालून कशासाठी? टोल वसुली सुरू पन रस्त्यावर मात्र खड्डे!
केज/प्रतिनिधी
अहमदनगर -जामखेड पाटोदा केज – धाराशिव या महामार्गावर असलेला (एन.एच.-५४८डी) वरील उमरी टोलनाक्या जवळच सध्या नागरिकांना आपला जीव धोक्यात घालुन प्रवास करावा लागत आहे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एन.एच.ए.आय) मार्फत चालवला जाणारा हा टोल नाका असून सुद्धा रस्त्यांची अवस्थाअतिशय बिकट झाली आहे. टोल वसुली मात्र नेहमीप्रमाणे सुरू आहे, पण रस्तात मात्र खड्डेच – खड्डे आहेत. रस्त्यावर इतके मोठमोठे खड्डे पडले असून त्यातून लोखंडी रॉड उघड्यावर आले आहेत, वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काही वाहनाचे खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. विशेषतः सावंतवाडी पुलाजवळच्या भागात तर रस्त्याची अवस्था मृत्यूचा सापळा ठरत आहे.काही दिवसांपूर्वी पुलावरील खड्डे चुकवताना टाकळी पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला, तरीसुद्धा संबंधित प्रशासनाकडून आजपर्यंत कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही.दररोज शेकडो वाहने आणि हजारो प्रवासी या रस्त्याने प्रवास करतात. केज तालुका हा बीड जिल्ह्याकडे जाणारा मुख्य दळणवळण मार्ग असल्याने या महामार्गावर वाहतूक नेहमीच मोठ्या प्रमाणात असते. तरी देखील रस्ता दुरुस्ती, देखभाल किंवा अपघात टाळण्यासाठी कोणतीही खबरदारी घेतली जात नाही, हे अत्यंत गंभीर आहे.”टोल घेताय पण सेवा कुठे आहे?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या निष्क्रियतेमुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार? असाज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे.वाहनधारक व स्थानिक नागरिकांनी या विषयाकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच (एन.एच.ए.आय) आणि टोल व्यवस्थापना विरोधात चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.





















