प्रामाणिक कार्याची ज्या दिवशी लोक कदर करतील, त्या दिवशी सर्वसामान्यांच्या पोरांना राजकारणात संधी मिळेल; तोवर पैसेवालेच राजकारणावर राज्य करतील!”
बीड/प्रतिनिधी
राजकारण हे एकेकाळी समाजसेवेचे माध्यम मानले जायचे, पण आज ते सत्तेचा खेळ, पैशांचा बाजार आणि गटबाजीचे रणांगण बनले आहे. आजच्या काळात समाजासाठी प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची दखल घेतली जात नाही, उलट अशा कार्यकर्त्यांना राजकारणातून दूर ठेवण्याचे काम होत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. शहर असो वा ग्रामीण भाग सर्वत्र ‘पैसा आणि पाठबळ’ हाच उमेदवारीचा निकष झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य घरातील, संघर्षातून उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणं कठीण झाले आहे. “प्रामाणिक कार्याची ज्या दिवशी लोक कदर करतील, त्या दिवशीच सर्वसामान्यांच्या पोरांना राजकारणात स्थान मिळेल; तोवर नाहीच!” अशी भावना जनतेतून, कार्यकर्त्यांतून मोठ्या प्रमाणात उमटत आहे.स्थानिक राजकारणातही अशा अनेक उदाहरणांचा उल्लेख केला जात आहे काही कार्यकर्त वर्षानुवर्षे जनतेच्या प्रश्नांसाठी लढत असतात, परंतु निवडणुकीच्या वेळी तिकीट मात्र मोठ्या पैशवाले किंवा गटांशी नाळ जुळवणाऱ्यांनाच मिळते. समाजाच्या हितासाठी आवाज उठवणाऱ्यांना मात्र “शांत राहा” असा सल्ला दिला जातो.
चौकट:-
एका तरुण कार्यकर्त्याने नाराजी व्यक्त करत सांगितलं की,”आम्ही जनतेच्या अडचणीसाठी लढतो, रस्त्यावर उतरतो, पण निवडणुकीत उमेदवारीचा विचारही आमच्यासाठी होत नाही. ज्या दिवशी लोक खऱ्या प्रामाणिकतेची दखल घेतील, तो दिवस खऱ्या अर्थाने समाजबदलाचा आरंभ ठरेल. “यावर ज्येष्ठ नागरिकांचंही मत एकमताने स्पष्ट आहे- लोकांनी विचारसरणी बदलल्याशिवाय राजकारणात बदल होणार नाही. जो जनतेसाठी काम करतो, त्याच्याच मागे उभे राहिले पाहिजे. पैसेवाल्यांना नाही, तर प्रामाणिक लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून पाठवण्याची वेळ आली आहे. आजच्या तरुण पिढीमध्ये जनसेवेची नवी लाट निर्माण होत असताना, त्यांना संधी मिळणे हे समाजाच्या जागृतीवर अवलंबून आहे. जनतेने ‘चमक-धमक’ बाजूला ठेवून प्रामाणिकतेचे मूल्यमापन केले, तरच राजकारणातील खऱ्या अर्थान परिवर्तन घडेल.





















