संविधानाची शपथ मोडणाऱ्या छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करा- राहुल मुळे
जनक्रांती न्युज/रामराजे जगताप
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी:- मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरू केले होते. आंदोलन स्थळी मोठ्या संख्येने मराठा समाज एकत्रित आला त्यातच संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर घराण्यांचे वंशज आनंदराज आंबेडकर यांच्यासह आंदोलणास दलित, मुस्लिम, ओबीसी बांधवांनी उपस्थित राहून जाहिर पाठिंबा दिला. त्यामुळे महाराष्ट्र शासनावर मराठा आरक्षण आंदोलनामुळे प्रचंड दबाव निर्माण झाला. आंदोलन सुरू असताना मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी वर्गाची बैठक घेऊन मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात येऊ नये अशी उघड मागणी केली. महाराष्ट्र शासनाने तसे केले तर ओबीसी राज्यभर आंदोलन करतील व लाखोंच्य संख्येने मुंबई येथे येथील अशी खुली चेतावणी महाराष्ट्र शासनास दिली. त्यातच मराठा समाजाच्या मागण्या संबंधी महाराष्ट्र सरकारने हैद्राबाद गॅझेट संबंधी शासन परिपत्रक निर्गमित केले. शासन परिपत्रकाला विरोध म्हणून मंत्री छगन भुजबळ यांनी सरकार विरूद्ध आंदोलन करणार असल्याचे जाहिर करून राज्यातील ओबीसी वर्गाला महाराष्ट्र शासन विरुद्ध आंदोलन करण्याचे आव्हान केले. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी संविधानाला साक्षी मानून भुजबळ यांना मंत्रीपदाची व गोपनीयतेची शपथ दिली होती. भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना कोणत्याही वर्गा विरुद्ध आकस व ममत्व भाव बाळगणार नाही अशी शपथ घेतली होती. परंतु मराठा आरक्षण विषयी महाराष्ट्र शासनाने शासन परिपत्रक निर्गमित केल्या नंतर मंत्री भुजबळ यांनी मराठा समाज व महाराष्ट्र सरकार विरुद्ध उघड भुमिका घेऊन महाराष्ट्र सरकारला उघड चेतावणी देत असल्याचे निदर्शनास आले. भारतीय लोकशाही मध्ये मंत्रीपदावर असताना एखादा मंत्री ज्या सरकार मध्ये मंत्री म्हणून कार्यरत आहे त्याच सरकार विरोधात उघड उघड विरोधी भुमिका घेत असल्याचे हे देशातील कदाचित पहिलेच उदाहरण असेल ? संवैधानिक पदावर असतानाही मंत्री भुजबळ यांच्या मनात मराठा समाज विरूद्ध मोठ्या प्रमाणात आकस व द्वेष भावना आहे हे यावरून स्पष्ट झाले. मंत्रीपदाची शपथ घेताना दिलेले वचन त्यांनी मोडलेले असल्याने मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हाकालपट्टी करावी अशी तक्रार कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे केली आहे.





















