शेतकऱ्यांचे पांढरे अन् पिवळे सोने स्वस्तामध्ये व्यापाऱ्यांच्या घशात?/मनमानी भावाने बेसुमार लुट !
संपादकीय/रोहन गलांडे
ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून सुरू झालेला पाऊस अधून-मधून पडत राहिला. सप्टेंबर महिन्यातही पावसाच्या सरी बरसत राहिल्या. ऑक्टोबर महिन्यात मात्र पावसाने उघडीप दिली, अतिवृष्टी आणि पूरस्थितीतून वाचलेले कापूस, मका आणि सोयाबीन, तूर पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले. शेतकऱ्यांनी ही पिके आता विकण्यासाठी काढली आहेत. मात्र, शासनाच्या सीसीआय आणि नाफेडची खरेदी सुरू नसल्याने खासगी व्यापारी विविध सबबी मांडून शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावाने खरेदी करू लागले आहेत.गतवर्षी तालुक्यात ६५ हजार हेक्टरवर पांढरे सोने म्हणविल्या जाणाऱ्या कापसाची लागवड झाली होती. यंदा खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये हे क्षेत्र घटून केवळ ४९ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. ‘पितळे सोने’ म्हणून ओळख असलेल्या मक्याची गतवर्षी १८ हजार हेक्टर लागवड होती, यंदा तुलनेत त्यात वाढ होऊन तब्बल 29 हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली होती. पिके जोमदार असल्याने यावर्षीची पीकस्थिती पाहता शेतकरी आनंदी होता. मोठे उत्पादन मिळेल आणि पदरात चार पैसेही पडतील, असे स्वप्न शेतकरी पाहू लागले. मात्र, सप्टेंबर महिन्यातील ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेला. क्षणात होत्याच नव्हतं झाले.
चौकट:-शेतमाल खरेदी केंद्र गेले तरी कुठे ?
पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांनी कापूस व मका विक्रीसाठी काढले आहे. मात्र शासनाचे सीसीआय किंवा नाफेडचे खरेदी केंद्र उपलब्ध नाही. परिणामी, ७७१० ते ८११० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव असूनही खासगी व्यापारी ओला, पिवळा व इतर सबबी पुढे करून ६००० ते ६५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी करू लागले आहेत तर मकाला हमीभाव २१०० ते २२०० च्या घरात असूनही स्थानिक व्यापारी अडलेल्या शेतकऱ्यांकडून आद्रतेचे कारण देत १२०० ते १५०० दरात मका खरेदी करीत आहेत





















